एम. भक्तवत्सलम | |
कार्यकाळ २ ऑक्टोबर १९६३ – ६ मार्च १९६७ | |
मागील | के. कामराज |
---|---|
पुढील | सी.एन. अण्णादुराई |
जन्म | ९ ऑक्टोबर १८९७ मद्रास प्रांत |
मृत्यू | १३ जानेवारी, १९८७ (वय ८९) चेन्नई |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
एम. भक्तवत्सलम (तमिळ: எம். பக்தவத்சலம்; ९ ऑक्टोबर, इ.स. १८९७ - १३ जानेवारी, इ.स. १९८७) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी भक्तवत्सलम मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन इत्यादी चळवळींदरम्यान तुरुंगात गेले होते. १९६३ ते १९६७ दरम्यान तमिळनाडूच्या मुख्यमत्रीपदावर आलेले भक्तवत्सलम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तमिळनाडूमधील अखेरचे मुख्यमंत्री होते. १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमकडून काँग्रेस पराभूत झाल्यानंतर भक्तवत्सलम यांनी राजकारण-संन्यास घेतला.
१९६३ साली रा.स्व. संघाचे सरसंघचालक माधव गोळवलकर ह्यांनी कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक स्थापन करण्याची मागणी उचलून धरली व त्यासाठी एकनाथ रानडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. भक्तवत्सलम व केंद्रीय मंत्री हुमायून कबीर ह्यांचा ह्या स्मारकाला तीव्र विरोध होता. परंतु रानड्यांनी ३२३ खासदारांचे समर्थन असलेले पत्र सादर केल्यामुळे भक्तवत्सलमांना माघार घेऊन ह्या स्मारकाच्या बांधकामास परवानगी द्यावी लागली.[१]