चेपॉकमध्ये पहिली कसोटी १० फेब्रुवारी १९३४ साली सुरू झाली, तर सर्वात पहिला रणजी करंडक सामना येथे १९३६ साली खेळवला गेला. भारतीय क्रिकेट संघाला ह्या मैदानावर त्यांचा पहिला कसोटी विजय मिळाला तो १९५२ साली इंग्लंडविरुद्ध. चेपॉक येथे १९८६ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवला गेलेला कसोटी सामना हा कसोटी इतिहासातील बरोबरीत सुटलेला फक्त दुसरा कसोटी सामना होता.[३][४]
बंगालच्या उपसागराच्या बाजूला मरिना समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर चेपॉक येथे हे मैदान वसलेले आहे. मैदानामध्ये उत्तरेकडून वाल्लाजाह मार्ग, पश्चिमेकडून बाबू जगजीवनराम मार्ग आणि दक्षिणेकडून पेक्रॉफ्ट मार्ग येथून प्रवेश केला जावू शकतो. मैदानाच्या पूर्वेदिशेलगत चेपॉक एमआरटीएस रेल्वे स्थानक आहे, जे चेन्नई समुद्रकिनाऱ्यावर आहे. मैदानाच्या उत्तरेला एका रेषेत कुवम नदी वाहते.
चेपॉकचा प्रेक्षकवर्ग हा देशातील सर्वात खिलाडू आणि दाद देणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.[१] १९९७ साली भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १९४ धावा केल्यानंतर सईद अन्वरचे चेन्नईच्या प्रेक्षकांनी उभे राहून अभिवादन केले होते. त्यानंतर पुन्हा १९९९ साली पाकिस्तानी संघाने कसोटी सामना जिंकल्यानंतरही प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली होती आणि प्रेक्षकांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल पाकिस्तानी संघाने लॅप ऑफ ऑनर[मराठी शब्द सुचवा] केला होता.[१]
ताणलेल्या फॅब्रिकच्या छताने नूतनीकरण केलेला नवीन स्टॅंड
जून २००९ मध्ये, १७५ कोटी (US$३८.८५ दशलक्ष) इतक्या किंमतीत मैदानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले..[५][६] बांधकामाच्या योजनेमध्ये १०,००० प्रेक्षक बसू शकतील असे पोलादाच्या जाळीने मजबूत केलेले कॉंक्रिटचे आय, जे आणि के स्टॅंड आणि अर्धपारदर्शक पीटएफई पडद्याचे छत असलेले २४ आदरातिथ्याचे बॉक्स यांचा समावेश होता.[७]तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने बांधकामासाठी हॉपकिन्स आर्किटेक्ट्स, लंडन आणि नटराज व वेंकट आर्किटेक्ट्स, चेन्नई यांना कंत्राट दिले होते.[२]
मैदानाचे नूतनीकरण २०११ मध्ये पूर्ण झाले आणि जूने खांबांच्या आधारावरचे छप्पर ज्यामुळे मैदान दिसण्यात अडचण होत असे त्याची जागा नवीन आणि वजनाने हलक्या चौकोनी आकाराच्या तारांनी एकत्र बांधलेल्या छपराने घेतली. सध्या मैदानाची प्रेक्षक क्षमता ३८,००० असून जी भविष्यात ४२,००० इतकी वाढवली जावू शकते. स्टॅंड्स 36° मध्ये चढते आहेत ज्यामुळे समुद्राची अल्हाददायक हवा घेता येते.[८]
३१ मार्च २०१५ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की मैदानाचे नूतनीकरण करताना सार्वजनिक सुरक्षा संबंधित नियमावलींचे उल्लंघन झाले आहे.[९][१०] न्यायालयाने निकाल दिला की नियमांचे उल्लंघन करणारा नूतनीकरणाच्या भाग पाडण्यात यावा आणि योग्य नियोजन परवानग्या जोपर्यंत मिळत नाहीत तसेच बांधकाम पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत तीन स्टॅण्ड (आय, जे, के) सीलबंद राहिले पाहिजेत.[११][१२] सध्या मैदानात क्रिकेट सामने खेळवताना आय, जे आणि के स्टॅंड प्रेक्षकांसाठी बंद आहेत.
रणजी करंडक स्पर्धेचा सर्वात पहिला सामना ४ नोव्हेंबर १९३४ रोजी मद्रास आणि म्हैसूर या संघांदरम्यान चेपॉक येथे खेळवला गेला.[१३] मद्रासच्या एम जे गोपालनने पहिला चेंडू एन कर्टिसला टाकला.
भारतीय संघाचे त्यांचा पहिला कसोटी विजय, त्यांच्या २४व्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध १९५२ मध्ये चेपॉक येथे नोंदवला.[१४]
१९८६ची भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची कसोटी ही क्रिकेट इतिहासातील बरोबरीत सुटलेली दुसरी कसोटी होती.[१५]
नरेंद्र हिरवाणीची जानेवारी १९८८ मधील वेस्ट इंडीज विरुद्ध ६१ धावांत ८ बळी ही भारतीय गोलंदाजातर्फे पदार्पणातील एका डावातील सर्वोत्कृष्ट आणि एकूण तिसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७] डिसेंबर २०१४, पर्यंत कसोटी पदार्पणात १० किंवा जास्त बळी घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज होता. हिरवानीची १३६ धावांमध्ये १६ बळी ही कोणत्याही गोलंदाजाची पदार्पणातील कसोटी सामन्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.[१८]
१९९७ साली पाकिस्तानच्या सईद अन्वरने भारताविरुद्ध १९४ धावा केल्या, तो त्यावेळचा एकदिवसीय क्रिकेटमधील एक विक्रम होता.[१९][२०]
१५ ऑक्टोबर २००४ रोजी, शेन वॉर्ननेमुथिया मुरलीधरनचा ५३२ कसोटी बळींचा विक्रम मोडला आणि त्यावेळी सर्वात जास्त कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनला.
विरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एप्रिल २००८ मध्ये याच मैदानावर ३१९ धावा केल्या. त्याने २७८ चेंडूंमध्ये ३०० धावा करून सर्वात जलद कसोटी त्रिशतक करण्याचा विक्रम केला. डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा नंतर दोन कसोटी त्रिशतके करणारा तो तिसराच फलंदाज. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी २५७ धावा केल्या, त्यामुळे तो १९५४ नंतर कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज ठरला. १९५४ मध्ये पाकिस्तान विरुद्ध नॉटिंगहॅममध्ये डेनिस कॉम्प्टनने सामन्याच्या दुसऱ्या दिवसी २७३ धावा केल्या होत्या.[२१]
सचिन तेंडूलकरने भारतातील इतर कोणत्याही मैदानापेक्षा चेपॉकवर सर्वात जास्त धावा केल्या आहे. त्याने ९ कसोटी सामन्यांमध्ये ८७.६० च्या सरासरीने ८७६ धावा केल्या आहेत.[२२]
२२ मार्च २००१ रोजी, भारताने ऑस्ट्रेलियाला २ गडी राखून पराभूत केले आणि त्यानंतर कोलकत्यामध्ये विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर चषक जिंकला. भारताच्या ह्या विजयाने ऑस्ट्रेलियाचा सलग १६ कसोटी सामन्यांची विजयी घोडदौड थांबवली.
डिसेंबर २००८ मधील इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्याच्या चवथ्या डावात भारताने ४ बाद ३८७ धावा करून सामना जिंकला, हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे.
चेपॉकवर सर्वात जास्त धावांचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यानी १९८५ मध्ये भारताविरुद्ध ७ बाद ६५२ धावा केल्या होत्या.[२३] मैदानावरील सर्वात कमी धावांचा विक्रम भारताच्या नावावर आहे, इंग्लंडने भारताला अवघ्या ८३ धावांवर रोखले होते.[२४] ह्या मैदानावार सर्वात जास्त १०१८ कसोटी धावा सुनील गावस्करने केल्या आहेत, त्यानंतर क्रमांक लागतो सचिन तेंडुलकर (९७० धावा) आणि गुंडप्पा विश्वनाथ (७८५ धावा) यांचा. ह्या मैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी आहेत अनिल कुंबळेचे (४८ बळी) त्यानंतर हरभजन सिंग (४२ बळी) आणि कपिल देव (४० बळी) यांचा क्रमांक लागतो.
चेपॉकवर सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या १९९७ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध उभारली होती (५ बाद ३२७), उत्तरादाखल भारताने सर्वबाद २९२ धावा केल्या, ही येथील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या. दुसरी सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या ८ बाद २९९ ही भारताने २२ ऑक्टोबर २०१५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती, हा सामना भारताने जिंकला होता. एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वात जास्त ३२२ धावा ह्या मैदानावर महेंद्रसिंग धोणीने केल्या आहेत[२५] तर मोहम्मद रफिकने सर्वाधिक ८ एकदिवसीय बळी मिळवले आहेत. भारतीय गोलंदाजातर्फे अजित आगरकरने येथे सर्वाधिक ७ बळी मिळवले आहेत.[२६]