वरी, वरई किंवा भगर हे भारतात उगवणारे एक भरड धान्य तथा तृणधान्य आहे. महाराष्ट्रात याच्यापासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठे आदी उपवासाचे अन्नपदार्थ बनतात.[१] हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते. कांग, कोदरी, कोदो, कुटकी, नाचणी, राळे प्रमाणेच या धान्यालाही कनिष्ठ प्रकारचे धान्य समजतात. प्रथिने व फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यास हे धान्य पोषक समजले जाते. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.[२]भारतीय केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१८ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे.[३] तसेच संयुक्त राष्ट्र संघानेही हे वर्ष जाहीर करावे यासाठी प्रयत्न केले. भगर हे उपवास करीता वापर होतो.
भरड धान्य ( पोलीश न केलेले) शिजवण्य पूर्वी ७ ते ८ तास भिजवणे महत्वाचे असते. भरड धान्या मध्ये अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स (Antinutritional Factors) म्हणजे काही घटक जे आहारातील पोषणाच्या शोषणाला प्रभावित करतात किंवा शरीरातील पोषक तत्वांच्या उपलब्धतेला कमी करतात. म्हणून भगर किवा कोणतही भरड धान्य भिजवल्यावर अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स (Antinutritional Factors) निघूनजातात किवा कमी होतात.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगातील आदिवासी पारंपरिक पीक म्हणून भगरीचे नियमित उत्पादन घेत असतात. तेथील आदिवासी भगरीला पादी, बर्टी आणि मोर असे म्हणतात. त्यानुसार त्याभागात पांढरी मोर, मोठी मोर, काळी मोर असे भगरीचे पारंपरिक प्रकार दिसून येतात. कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी मोठ्या प्रयत्नाने या भगरीला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देऊन हे प्रकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवले.[४]