सुरेश भट | |
---|---|
जन्म नाव | सुरेश श्रीधर भट |
टोपणनाव | गझलसम्राट |
जन्म |
एप्रिल १५, १९३२ अमरावती, महाराष्ट्र |
मृत्यू |
मार्च १४ ,२००३ नागपूर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | बौद्ध |
कार्यक्षेत्र | काव्य, साहित्य, पत्रकारिता |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, गझल |
प्रसिद्ध साहित्यकृती | रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग |
प्रभाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
वडील | श्रीधर रंगनाथ भट |
आई | शांता श्रीधर भट |
अपत्ये | विशाखा, हर्षवर्धन, चित्तरंजन |
स्वाक्षरी | |
संकेतस्थळ | https://www.sureshbhat.in |
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वतः हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणा-या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी ध्वनिमुद्रिका विकत आणत. ही संगीत आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते. त्यांचा गायनाचा एक कार्यक्रम अमरावतीत २०-२-१९८४ रोजी झाला होता. त्यावेळी साथीसाठी पेटीवर हृदयनाथ मंगेशकर होते. अंथरुणावर बसून आणि पडून त्यांनी गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ हा ग्रंथ आणि विष्णू नारायण भातखंडेकृत ‘संगीत खंड’, असे अनेक ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. त्यांनी ‘गानसोपान’ची अनेक पारायणे केली होती.
१९५२ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तो ही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.
भटांचा एक पाय दुर्बल झाल्यावर त्यांनी व्यायामावर जोर देऊन बाकीचे शरीर मजबूत बनवले. याचा उपयोग त्यांना गाण्यातही झाला. ते तासन् तास मैफली करू शकत. ते दंड-बैठका काढतच पण डबलबारवर १०० ते १५० डिप्स मारत. त्यामुळे इतकी शक्ती पायात आली की ते सायकल चालवू लागले. वडिलांनी त्यांना मिलर कंपनीचा डायनोमा असलेली रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी दिली होती. १९६५ मध्ये जेव्हा अमरावती रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल झाला तेव्हा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढण चढत. पण सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबलसीट घेऊन एका दमात ती चढण चढत. ते हुतूतू, व्हॉलीबॉलही खेळत. ते आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप (शोभादर्शक) आणि पेरिस्कोप (परिदर्शक) सुद्धा बनवीत. काचा कुटून पतंगाचा मांजा बनविण्यात ते वाकबगार होते. सुरेश भट यांना गुलेर (बेचकी किंवा गलोल) बनविता येई. त्यांचा नेम अचूक असे. ते पाहून श्रीधरपंतांनी त्यांच्यासाठी खास अमेरिकन स्लिंग शॉट बंदूक आणली होती. ती वापरून भट चिमणी, कबुतर घायाळ करीत. ते भालाफेकही करीत. भालाफेकीचा सराव घराजवळच्या निंबाच्या झाडावर चाले; तर तलवारबाजीचा प्रा. बाबा मोटे यांच्याबरोबर. एका घावात दोन तुकडे करण्यात सुरेश भट ‘एक्सपर्ट’ होते.
सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.[१]
सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली होती.[२]
सुरेश भट नास्तिक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे श्रद्धास्थान होते. बौद्ध धर्म हा ईश्वराचे अस्तित्त्व नाकारणारा व बाबासाहेबांचा धर्म आहे. यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, अशी फेसबुक पोस्ट त्यांचा मुलगा चित्तरंजन भट यांनी ३० एप्रिल २०१८ रोजी टाकली होती.[३]
सुरेश भट यांना एक मुलगी विशाखा व दोन मुलगे हर्षवर्धन व चित्तरंजन होती. त्यापैकी हर्षवर्धन याचा अपघातात मृत्यू झाला होता.
हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.[४]